Wednesday, September 21, 2011

तू रोज रोज नाही बोललास तरी काही हरकत नाही..

तू रोज रोज नाही बोललास तरी काही हरकत नाही..
पण तुझे माझी नजर टाळून जाणे,
मी कधीच सहन करू शकत नाही...

मला का समजत नाही तुझे मन...,
मी का ओळखत नाही आपले ॠणानुबन्धन..

पण खरच गरज आहे का,
त्या नात्याच्या चौकटीची...
अन कुठल्याही कबुलीची...??

आणि खरच का गरज आहे,
जगाला ओरडून सान्गण्याची..?
आणि सारे काही फ़क्त फ़क्त माझ्यापासून लपविण्याची..??

ह्या दोघान्चीही गरज नाही आहे रे सख्या...
गरज आहे ती फ़क्त निखळ सत्य स्वीकारण्याची...

तुझ्या आणि माझ्या मनातलया त्या प्रेमाच्या ग्वाहीची...
अपेक्षा आहे ती फक्त प्रेमासाठी प्रेम करण्याची !!

Monday, September 19, 2011

आता कळतंय, तुझ्या प्रेमात पडलेय ते

आता कळतंय, तुझ्या प्रेमात पडलेय ते. याआधी रोजची संध्याकाळ अशी कातर नव्हती. आता वेळ जाता जात नाही. पण सांगणार तरी कसं? तुला तर थांगपत्ताही नाही. तू आपला बेफिकीर, स्वच्छंद, आपल्याच मस्तीत असतोस. जगाकडे लक्ष द्यायला तुला वेळ कुठाय? ' मला 'नाही' ऐकायची सवय नाही,' हा तुझा हेका आणि जे हवंय ते मिळवायचा अट्टहास. माझे नियम वेगळे आहेत रे तुझ्यापेक्षा. तुझ्याइतकं फायदा-तोटा बघून नाही वागता येत मला. त्या क्षणाला जे वाटतं, ते करून टाकते मी. एका अर्थाने मीसुद्धा स्वच्छंदी आहे. पण तुझ्यासाठी तेवढीच हळवी, केअरिंग आहे. आजकाल 'मैंने प्यार किया'चं टायटल साँग मी अगदी तन्मयतेने ऐकायला लागलेय. स्वप्नात रमणं आवडतंय. कधीतरी अगदी खुश होऊन नाचावंसं वाटतं. बासरीच्या सुरांवर डोलावंसं वाटतं. कधी अचानक बेचैनी जाणवायला लागते, डोळे भरून येतात. इतक्या सहज माणूस प्रेमात पडतो? तू कधी प्रेम केलंस कुणावर? इतकं सुंदर, आश्वासक फीलिंग दुसरं कुठलंही नसेल. माहितीय, तुला सांगणं मला कधीच जमणार नाही. भीती वाटते, कुणी दुसरीच आवडत असेल तुला तर? नाही सहन होणार मला ते. त्यापेक्षा हे सीक्रेट माझ्यापुरतं राहूदे. फक्त माझ्यापुरतं! मनोमन वाट बघत राहेन तुझ्या विचारण्याची. पण नाहीच विचारलंस, तरी चालेल. रिमझिम पावसात भिजताना तू आठवतोस. असं वाटतं, आता अचानक मागून छत्री घेऊन येशील. 'किती भिजतेस?' असं म्हणून दटावशील आणि माझ्या हातात गरमागरम कॉफीचा कप ठेवशील. बघ, माझी मनोराज्य सुरू झाली. माझा आतला आवाज सांगतो, की तू कधीतरी येशील. मी दर पावसाळ्यात तुझी वाट बघेन. येशील ना?

- तुझीच

पुढच्या जन्मी माझा साथीदार

आपल्या आयुष्यात एक अशी व्यक्ती येते, की ज्याच्यावर सर्वाधिक प्रेम करतो. जास्त विश्वास आपण त्याच्यावरच ठेवतो. तसाच माझ्या आयुष्यात गौरव आला. त्याला पहिल्यांदा मी कॉलेजमध्ये पाहिलं आणि मैत्री करावीशी वाटली. फ्रेण्डशिप डेच्या दिवशी मैत्रीही केली. असं वाटायचं, की फक्त त्याला बघत बसावं. त्याचा हास्यचेहरा बघून मला अनोखा आनंद व्हायचा. पण त्याच्याशी बोलण्याची हिंमत व्हायची नाही. फक्त त्याचाच विचार करावा, त्याच्याशिवाय सोबत कोणीही नसावं, असं वाटायचं. मनातलं हे गुपित माझ्या मैत्रिणींना सांगितलं आणि त्यांनी ते जाऊन गौरवला सांगितलं. पण त्याचं उत्तर आलं नाही मला. या गोष्टीचं काहीच दु:ख नव्हतं. कारण त्याच्या जागी मी असते, तर माझंही उत्तर तेच असतं. ज्या व्यक्तीशी मी फक्त मैत्री केली आणि ज्याच्याबरोबर फारसं बोललेही नाही, त्याला पटकन 'हो' सांगणं कठीण आहे. तरीही मी त्याच्यावर खूप प्रेम करते. त्याला एक दिवस पाहिलं नाही, तर 'मी कॉलेजला का आले,' असं वाटायचं. त्याच्याशिवाय माझ्या मनात दुसरा कुठल्याच मुलाचे विचार येणं शक्य नाही. काही दिवसांनंतर गौरव आमच्या वर्गात येऊन बसायला लागला. नेहमी मागे वळून आमच्या बेंचकडे पाहायला लागला. त्याचं ते पाहणं, आमची नजरानजर झाल्यावर त्याच्या मित्राकडे बघून बोलणं, पुन्हा बोलता बोलता माझ्याकडे पाहणं असं त्याचं वागणं यातून माझ्या मनात त्याच्याबद्दल आणखी प्रेम वाढलं. त्याच्या काही मैत्रिणी माझ्या वर्गात आहेत. त्यांच्याकडून गौरवबद्दल आणखी काही माहिती मिळाली. मला हे समजलं, की गौरवचं कोणत्याही मुलीबरोबर प्रेमप्रकरण नव्हतं. तो मैत्रिणींशी फक्त मैत्रीच्या नात्याने बोलतो. त्याचे आईवडील जी मुलगी शोधून देतील, तिच्याबरोबर त्याला लग्न करायचंय, हे ऐकून माझ्या मनात गौरवसाठी जी इज्जत होती, ती अधिक वाढली. जो एका मित्राचं आणि मुलाचं कर्तव्य इतक्या चांगल्या प्रकारे पूर्ण करू शकतो, त्याला चांगली व्यक्ती म्हणता येतं. प्रत्येक मुलगी हेच स्वप्न पाहत असते, की तिचा जोडीदार चांगला असावा. पण प्रत्येकाचं स्वप्न पूर्ण होत नाही. गौरवशी बोलण्याचा प्रयत्न माझा सुरूच होता. पण तो समोर आल्यावर माझ्या तोंडातून शब्द निघत नाहीत. त्याचं ते तिरप्या नजरेने पाहणं मला अस्वस्थ करतं. त्याचं त्याच्या मैत्रिणींशी जास्त बोलणं पाहून मला खूप वाईट वाटायचं. माझा उदास चेहरा पाहून माझ्या मैत्रिणीने त्याला सांगितलं. पण त्याचं उत्तर आलं नाही. तो माझ्यावर प्रेम करत नसेल, तर? नसो, पण मी त्याच्यावर खूप प्रेम करत होते, करते आणि करत राहणार. म्हणतात ना, खरं प्रेम असलं, की ती व्यक्ती स्वत:हून आपल्याकडे येते... माझं मन आजही त्याला पाहण्यासाठी, बोलण्यासाठी व्याकूळ झालेलं असतं. गौरव स्वत:हून माझ्याजवळ येईल, त्या क्षणाची मी वाट बघतेय. या जन्मी गौरव माझा झाला नाही, तर देवाला मी सांगेन, की पुढच्या जन्मी माझा साथीदार फक्त गौरव असावा...

त्याचीच,

उगीचच आपली भेट झाली. उगीचच इतकी ओळख झाली.

प्रेमात पडणं वगैरे सब झूठ असतं, असं मानणारी मी. आजूबाजूला गळ्यात गळे घालून फिरणारी प्रेमी युुगुलं पाहिली, की हा माझा मार्ग नव्हे, असं मानणारी मी. एकाच कंपनीत काम करताना सुरुवातीला तुझ्याशी तुटकपणे, जितक्यास तितकं वागणारी मी... तू कधी माझ्या हृदयाचा ताबा घेतलास, हे मात्र कळलंच नाही मला! ' मैत्रिणीकडे संत्र्याच्या झाडाचं बोन्साय पाहिलं. एवढ्याशा कुंडीतल्या झाडावर केवढी तरी संत्री लागलेली होती. मोठ्या उत्साहात मी तुला सांगितलं. त्यावर एकदम उसळून तू म्हणालास, 'बोन्साय? छे, मला नाही आवडत हे असले प्रकार. माणसाच्या फायद्यासाठी केलेलं क्रौर्य आहे हे. अगं, झाडांनाही मन असतं. मुक्तपणे त्यांना वाढू द्यायचं. आपल्या स्वातंत्र्यावर गदा आली, तर किती राग येतो आपल्याला! तसाच त्यांनाही येत असेल. पण ती झाडं बिचारी बोलू नाही शकत. जे आपल्या भावना व्यक्त करू शकत नाहीत, अशांच्या भावना आपण जाणून घेऊ शकत नसू, तर माणूस म्हणायच्या योग्यतेचेच नाही आपण!' छोटीशीच घटना, पण झाडांच्याही भावना समजून घेणारं तुझं तरल संवेदनशील मन मला अगदी खोलवर आवडून गेलं. माझ्याबाबतीतली प्रत्येक गोष्ट तुला सांगितल्याशिवाय मग मला चैनच पडेनासं झालं. एखाद्या दिवशी मूड नसेल, तर काहीतरी जोक्स सांगून तुझं हसवणं, रागावणं, रुसणं हे सारं मला आवडू लागलं. मला म्हणायचास, की डोळ्यांनी बोलायला शिक. प्रत्येक गोष्ट शब्दात सांगता येत नाही. तुला ती कला चांगलीच अवगत आहे. माझ्या डोळ्यांनी मात्र माझ्याही नकळत माझ्या मृदू भावना तुझ्यापर्यंत पोहोचवल्या असाव्यात. तुझ्याबद्दलच्या भावनांचा माझ्याआधी तुला सुगावा लागला. पण त्या वेळेपासून तू स्वत:ला अलिप्तच ठेवायला लागलास. राधेने श्रीकृष्णाला 'निमोर्ही' असं म्हटलं होतं. दुसऱ्याला आपल्या मोहात पाडायचं आणि स्वत: मात्र कमलदलाप्रमाणे अलिप्त राहायचं. तसंच काहीसं मला तुझ्याबाबतीत वाटू लागलंय. मला माहीत आहे, जात-वय यासारख्या समाजाने घातलेल्या बंधनांमुळे आपण नाही एकत्र येऊ शकत. पण प्रेमात काय आणि युद्धात काय, सारं काही क्षम्य असतं, असं म्हणतात, ते खोटंच म्हणावं लागेल. कुठेतरी वाचलंय, की प्रेम हे प्रतिध्वनीसारखं असतं. जितक्या तीव्रतेने तुम्ही एखाद्यावर प्रेम कराल, तितक्याच तीव्रतेने ते तुमच्याकडे परत येईल. पण ज्याअथीर् ते माझ्याकडे परत येत नाहीय, त्याआथीर् मी असं समजेन, की माझ्याकडून तितकं प्रेमच केलं गेलं नसावं... पण... हेही खरं मानायला माझं मन तयार होत नाही. आता असं वाटतं, की उगीचच आपली भेट झाली. उगीचच इतकी ओळख झाली. या जन्मी जर शक्य नसेल, तर निदान पुढच्या जन्मी तरी असं राधा नाही... 'रुक्मिणी' व्हायचंय मला!-

तुझी,

मैत्रीचा हक्क तरी माझ्यापासून हिरावून घेऊ नकोस.

प्रेम ही कल्पना मनाला स्पर्शून जाते. ही भावनाच निराळी आहे. प्रेमाची व्याख्या सगळे करतात. माझी व्याख्या वेगळी आहे. एकमेकांना समजून घेतलं, विश्वास ठेवला, विचारांची तडजोड केली, तरच संसार सुखाचा होतो. मी तुझ्यावर प्रेम केलं. तुला समजून घेतलं, तुझ्यावर विश्वासही ठेवला. तुला मी आवडत होते, तर का तुला असं वाटलं, की आपलं प्रेम संपवून टाकू या? केवळ ग्रुपमधल्या मैत्रिणी तुला काहीतरी बोलल्या आणि तू मला सोडण्याचा निर्णय घेतलास. असं का वागलास? काय कारण होतं, माझं प्रेम तोडण्याचं? का मला टाळत होतास? हे सर्व प्रश्न माझ्या मनात घर करून आहेत. मी तुला विचारलंही, पण तू मला टोलवाटोलवीची उत्तरं दिलीस. म्हणून यापुढे तुला प्रश्न विचारणार नाही. तू स्वत:हून सांगशील, याची वाट बघेन. प्रेम तोडण्याचं कडू विष मला प्यायला लावलंस. पण तू सुखात राहावंस, एवढीच माझी इच्छा आहे. शैलेश, तुला आठवतात, आपण सोबत घालवलेले दिवस? 14 फेब्रुवारी 2004 ते 26 ऑक्टोबर 2004 हे माझ्यासाठी अनमोल क्षण आहेत आणि यापुढेही असतील. आयुष्यात कधीही विसरता येणार नाहीत. तुला वाटत असेल, की मी खोटं बोलते. पण यातला शब्दन्शब्द खरा आहे. माझ्या आयुष्यात तुला किती महत्त्वाचं स्थान आहे, हे तुला माहीत नाही. माझं प्रेम खरं आहे रे तुझ्यावर. मला तुझी मैत्री गमवायची नाही. प्रेमाआधी जी मैत्री होती, ती मला हवी आहे. मनातलं सर्व काही तुला सांगितलं असतं, पण कदाचित तू ऐकलंही नसतंस. एकाच ग्रुपमध्ये राहून तुला माझ्याशी बोलायला वेळ मिळत नाही ना! म्हणून माझ्या मनातला भावना तुला पत्राने कळवण्याचा निर्णय घेतला. हे सर्व मी तुझ्यासाठीच केलं. मी तुझ्यातला प्रियकर गमावला. तुझ्यातला मित्र गमवायचा नाही. तू सांगशील, ते मान्य करेन, पण माझ्याशी मैत्री तोडू नको. ही मैत्री निर्मळ, निखळ असेल. प्रेमाचा एकही विषय मी काढणार नाही. तू सुखात राहा, हीच प्रार्थना मी रोज करते आणि करत राहेन. तुला कधीच विसरू शकत नाही. ज्याला आपण विसरतो, त्याची आठवण येते. तू नेहमी माझ्या मनात राहतोस. तुझ्या सुखासाठी काहीही करायला तयार आहे. म्हणून तर प्रेम संपवून टाकलं, तरी तुझी मैत्री नाही संपवली. तुला माझ्या या भावना कळल्या, तर मी सर्व काही जिकलं. माझं प्रेम आजही तूच आहेस, उद्याही तूच राहशील, तू माझ्यासोबत राहा किंवा नको राहू, आयुष्यभर तुझ्या आठवणी माझ्यासोबत राहतील. प्रेम करते तुझ्यावर, तिरस्कार करू नकोस, आयुष्यात माझ्याशी कधीही बोलणं सोडू नकोस. सर्व सहन करेन मी, पण तुझा अबोला नाही. सदैव सुखात राहा, आयुष्यात पुढे जात असताना एकदा तरी मागे वळून पाहा. उभी असेल तिथे फक्त तुझी मैत्रीण, मैत्रीचा हक्क तरी माझ्यापासून हिरावून घेऊ नकोस.-

तुझी मैत्रीण,

प्रेम ही एक सजा आहे

माझ्या मनातील प्रत्येक भाव तू ओळखला आहेस. तुझ्यापासून काहीच लपून राहिलेलं नाही. तुझ्याही मनात माझ्याबद्दल प्रेम, आस, कोमल भावना आहे. माझ्याही मनात तेच आहे. तरीही आपण दूर आहोत. का? कशासाठी? या भेकड समाजासाठी की या समाजाला घाबरणाऱ्या आपल्या आईवडिलांसाठी? कुणी बनवला हा समाज? आपणच. मग याला का घाबरायचं? तुझी आणि माझी जात वेगळी आहे, म्हणून आपण दूर-दूर राहायचं? मला नाही पटत हे सगळं. खरं सांगू, हे सगळं मी तुच्छ मानते. या जगात सर्वश्रेष्ठ मैत्री आणि प्रेम या दोनच गोष्टी खऱ्या आहेत. त्या नि:स्वाथीर् असतात आणि जर या गोष्टी नि:स्वाथीर् नसतील, तर त्या खऱ्याही नसतात. तुझ्या प्रेमात पडल्यापासून मी बरंच काही शिकले. प्रेम सगळं शिकवतं, असं म्हणतात ना, ते खरं असल्याचं मी अनुभवलं. तुझ्या प्रेमाने मला कवी बनवलं. सहनशील, स्वतंत्र विचारसरणीचं नम्र व्हायला लावलं. स्पर्शाशिवायही आधार देता येतो, याची तुला उत्तम जाणीव आहे. तुझा बोलका चेहरा सतत माझ्यासमोर असतो आणि तो पाहून माझी लेखणीही उत्तर देऊ लागते. तुझं ते गोड हसणं पाहून कुणी फिदा नाही झालं, तरच नवल. तुझा खेळकर स्वभाव कुणालाही आपलंसं करतो. तुझ्या शुद्ध आणि नि:स्वाथीर् हसऱ्या-गोड स्वभावामुळेच मी तुझ्यात कधी गुंतत गेले, कळलंच नाही. कदाचित आपलं प्रेम मोठ्यांच्या नजरेत चुकीची गोष्ट असेल. पण प्रेम करताना मी त्यांची परवानगी घेतली नव्हती. आताही मी घाबरत नाही. तुझा स्वभाव 'मोडेन पण वाकणार नाही,' असा आहे. मग आपण चुकत नसलो, तर भीती कशाची? प्रत्येकाच्या आयुष्यात प्रेमाचे गोड क्षण येतात. ते लग्नाआधी आले, तर त्याला मान्यता मिळत नाही. का? ते मलाही माहीत नाही. पण मला इतकं नक्कीच ठाऊक आहे, की तू माझा आहेस... फक्त माझा! आयुष्यात प्रत्येकाने एकदा प्रेम केलंच पाहिजे, लोकं म्हणतात, प्रेम ही एक सजा आहे, पण त्यांना कुठे ठाऊक असतं, की झुरण्यात काय मजा आहे...

- फक्त तुझीच,

तुला पाहिलं आणि प्रेम या शब्दाचा अर्थ समजला.

तुला पाहिलं आणि प्रेम या शब्दाचा अर्थ समजला. प्रीतीचं फूल तुलाच अर्पण केलं. तुझ्या त्या पहिल्याच प्रेमळ नजरेच्या दवबिंदूत भिजून गेले मी आणि मग कळलंच नाही , की कधी तुझ्यात इतकी गुंतले मी! तुझ्याही मनाच्या प्रीतबागेत प्रीतीचा केवडा फुलला होता आणि मी तर तुझी राधा झाले होते. पण... पण का कुणास ठाऊक , तू माझ्यावरील प्रेम व्यक्तच केलं नाहीस. मी मात्र प्रीतीच्या शांत किनाऱ्यावर तुझ्या होकाराच्या प्रतीक्षेत बसून राहिले. आपलं प्रेम अबोलच , तरीही ते एकमेकांच्या मनाला जाणवत होतं. म्हणूनच तर... तू वळून पाहिलंस. तुझा तो एक दृष्टिक्षेप... त्या क्षणाला वाटलं. तू फक्त माझा आहेस. फक्त माझा. मी धावले तुझ्या मिठीत विसावण्यासाठी. वाटलं , की विरघळलास माझ्यात तू. पहिली मी आणि नंतर तू असं आपलं वेगळं अस्तित्व आता उरलेलं नाही. पण...तो निव्वळ माझा भ्रम होता. माझ्या हातात गवसली , ती फक्त तुझी सावली. तीही सूर्यास्तानंतर माझ्या हातून निसटली रे..! माझी ओंजळ रिकामी ती रिकामीच. ते दिवस मात्र मोरपंखी होते. आरशात चेहरा पाहताना भाळी लावलेला चंद कसा दिलखुलास हसायचा. केसात माळलेला गजराही मग लाजायचा. मन पाखरू झालं होतं. तुझ्याच अवतीभोवती ते रुंजी घालत राहायचं. आता मात्र... सारंच चित्र बदललंय. आता पूवीर्सारखे गुलाब आवडत नाहीत मला. रातराणीच आवडते. कारण रात्रभर तीच एक सोबत देते. माझ्या माळ्यावरचा चंदही रुसलाय. तुझ्या आठवणींची रोज मैफल भरते आणि डोळ्यांतून श्रावणसरी बसरते. तरीही मनात एक आशा सूयोर्दयाबरोबर जन्म घेते. अजूनही वाटतं , की तू येशील. ओल्याचिंब देहानेच मला कवेत घेशील आणि म्हणशील , ' फक्त तुझ्यासाठी आलोय. तुझी प्रतीक्षा संपली. आपण एक प्रेमनगर वसवू. माझी हृदयस्वामिनी आहेस तू. ' माझ्या स्पर्शाचा नाजूक गुलाब टिपशील तू एखाद्या गुणगुणाऱ्या भ्रमरासारखा. माझ्या केसातील गजराही लाजेल. माझ्या माळ्यावरील चंदही हसेल पुन्हा. आपलं अबोल प्रेम बहरेल , फुलेल. मला अजूनही वाटतं. तू परत येशील , आपल्या अबोल प्रेमाला शब्दांचं दान देशील. येशील ना साथी ?

जीवनाच्या वाटेवर किती जण भेटतात

जीवनाच्या वाटेवर किती जण भेटतात, त्याची गणती नसते. पण गणतीत न बसणारे तुझ्यासारखे क्वचितच असतात. क्षणभुंगर जीवनात प्रत्येक जण जगायचा असतो आणि मी तुझ्या सहवासात तो जगत आहे. तुला पाहिलं, तेव्हापासून एक अनामिक ओढ लागली. तुला जाणून घ्यायची प्रबळ इच्छा मनात घर करू लागली. पण नेमक्या शब्दात मांडता येत नाही... कोणत्याही नात्याची सुरुवात प्रथम मैत्रीतूनच होत असते. मी त्याला आवडते, हे त्याने जरी प्रत्यक्ष व्यक्त केलं नसलं, तरी त्याच्या डोळ्यातील भाव खूप काही सांगून गेले. शब्दाविना झालेला संवाद हृदयापर्यंत पोहोचला अन् स्वर्गसुखाचा आनंद मिळाला. त्याला 'आय लव्ह यू' हे शब्द फार बोथट, उथळ वाटतात. त्याची भावना तीन शब्दात मावणारी नव्हती. आमचं प्रेम फार समंजस आहे. त्यातही समान प्रेम देण्याची आणि घेण्याची वृत्ती असल्यामुळे ते अधिकच दृढ झालंय. माझा छोटासा आनंद, दु:ख मी तुला सांगावं अन् तू मला ते समजवून सांगावंस, असं वाटतं. तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे. म्हणूनच तर तुझ्यापासून दूर राहावंसं वाटत नाही. पण या अशा समंजस प्रेमात माझ्याकडून एक चूक घडली. ती म्हणजे, दुसऱ्याच्या बोलण्यावरून त्याच्यावर संशय घेतला. तेव्हा त्याला फार वाईट वाटलं. कारण जसं कोणतंही नातं विश्वास, आपुलकीवर आधारलेलं असतं, तसं आमचंही आहे. चूक उमगल्यावर फार पश्चात्ताप झाला. त्याबद्दल माफी मागते. तू आधी कविता वगैरे करायचास, ते आज बंद केलंस, याचं वाईट वाटतं. कारण कवितांच्या माध्यमातून आपण आपल्या भावना, सुखदु:ख व्यक्त करत असतो. माणसाने वेळात वेळ काढून आपला छंद, कला जोपासायला हवी. म्हणून तू पुन्हा कवितेच्या विश्वास रमून मन प्रफुल्लित ठेव, हीच माझी इच्छा आहे. दूर राहूनही तुझी साथ मला हवी आहे... देशील? प्रेमाने ओतप्रोत भरलेले शब्द साठवून माझं ध्येय गाठायचंय. त्यासाठी बळ मला तुझ्याकडून हवंय... देशील ना? प्रेमात बंधनं, मर्यादा काही स्तरावर असाव्यात, कारण ती अंतरीची ओढ असते. जमेल तसं घ्यायचं अन् जमेल तसं द्यायचं असतं. पण त्याच्यासाठी एक जिवंत मन असावं लागतं. प्रेमाचे क्षण वेचायला आणि टिपायला, हो ना?

- तुझीच,

प्रिया

Thursday, September 8, 2011

मैत्री की प्रेम ?

कधी न संपणारी
फक्त मैत्रीच असत्ते
मैत्रीमधले प्रेमही तसेच असते
... कधीच न संपणारे

मैत्रीमध्ये हसवा रुसवा असतो
प्रेमात फक्त रुसवा अन फसवा असतो
मैत्री नाजूक धागा आणि अटूट बंधन
प्रेम कीतीही नाजूक पण टूटतेच कधीतरी

प्रेम ह्याने केले प्रेम त्याने केले
प्रेम करणारा एकटाच असतो ना
मैत्री मी केली का त्याने केली
मैत्री तिधेही निभावतात....

मैत्रीनेच प्रेमाला सुरूवात होते
ऐकल होते पण खरच आहे की..
माझ्या मैत्रीत प्रेम आहे...
पण माझ्या प्रेमात मैत्री कधीच नसणार...
फक्त प्रेम आणि फक्त प्रेमच असेल..

तुम्हाला कोणते प्रेम आवडते...
प्रेमात मैत्री असते मैत्रीनंतर प्रेम असते
मैत्रीपेक्षा जास्त प्रेम की प्रेमापेक्षा जास्त मैत्री?
मग तूम्ही काय मागाल... मैत्री की प्रेम ?