Tuesday, May 31, 2011

हृदयस्पर्शी भावना

दहशतवादाचा चटका बसलेल्या अनेक भारतीय कुटुंबापैकी एका कुटुंबातील लहान मुलाची हृदयस्पर्शी भावना
इयत्ता पाचवीचा वर्ग
शिक्षक :- अजय तू मोठा झाल्यावर काय बनणार ?
अजय :- मी अभियंता होऊन अमेरिकेत जाणार.
शिक्षक :- छान, विजय तू मोठा झाल्यावर काय बनणार?
विजय :- मी मोठा झाल्यावर माझ्या भारत देशासाठी शहीद होणार.
शिक्षक :- एवढ्याश्या वयात तू असा विचार कसा आणि का करतोस ?
विजय :- सर, योगायोगाने आमच्या घरात शहीद होण्याची परंपरा बनली आहे.
शिक्षक :- तुझ्या घरचे सर्व भारतीय सैन्यात होते का ?
विजय :- नाही.
शिक्षक :- मग शहीद होण्याची परंपरा असे का म्हणतोस ?
विजय :- सर माझे पंजोबा मुंबई मध्ये झालेल्या १९९३ च्या बॉम्बस्फोटात शहीद झाले.
माझे आजोबा २००६ च्या लोकल ट्रेन मधील बोंब स्फोटामध्ये शहीद झाले.
आणि माझे वडील ............ माझे वडील २००८ मधील मुंबई हल्ल्या मध्ये शहीद झाले.
हि तिघेही निरपराधी साधी माणसे होती, आपल्या कुटुंबासाठी दिवस रात्र कष्ट करत होती, तिघांच्या वेळेला आमचे जरा कुठे चांगले दिवस आले होते, तेवड्यात ते ह्या आतंकी हल्यात शहीद झाले. आता आम्हाला निरपराधी साधी माणसे असून सुद्धा शहीद होण्याची सवय झाली आहे सर.

Sunday, May 29, 2011

Thursday, May 26, 2011

माझा एकांत आणि मी.



आजकाल इथं आम्ही दोघंच असतो..
माझा एकांत आणि मी.
आजकाल तसं दुस-या कुणाशी
फारसं पटत नाही..
तासन तास दोघं बोलत बसतो,
निश्चल अंधाराच्या काठाशी,
कधी मनात जपलेल्या वाटांशी..
पहाटे.. किरकिरं घड्याळ
तुझी स्वप्नं गढूळ करतं,
माझ्यासारखाच तेव्हा तोही चिडतो.
मग मी घड्याळाला गप्प करतो.
‘आता स्वप्नांतही भेटणं नाही’,
असंच काहीसं बडबडतो..

Wednesday, May 25, 2011

मनात जपता आले तर

रविवारी गावी गेलो होतो. माझ्या चुंलत पुतणीच लग्न होतं. ती दिलीय कोणाला तर माझ्या आत्याच्या नातवाला. त्यामुळे लग्न दोन्ही कडूनही जवळच. लग्न गावाकडे. मला दोघेही खूप मानतात. त्या दोघांचं जेवणाचं ताट मीच केलं दोघांना एकेक घास भरवला. नंतर एक लाडू घेतला. आधी नवरदेवाला त्यातला एक घास घ्यायला लावला. नंतर त्याच उष्टावलेल्या बाजूचा एक घास नवरीला घ्यायला लावला. आणि मग तो लाडू नवरदेवाच्या हाती देत म्हणालो, ” आता हा उरलेला लाडू खायचा नाही बरा का ? तो असाच जपून ठेवायचा. “

” पण सांभाळायचा कोणी त्यांनी का मी ?” नवरी म्हणाली.

” दोघांनीही !!!! आपापल्या मनात.
गोड आठवणींचे असे अनेक लाडू प्रत्येकाला आपल्या मनात जपता आले तर आयुष्य किती गोड होईल नाही !
सुहास पवार ....

Tuesday, May 24, 2011

"प्रेम" यालाच का म्हणावे?

 

प्रेम कधी मागून मिळत नाही
ते आतून जाणवावं लागतं,
नजरेतून कळलं तरी
शब्दांतून सांगावं लागतं...
रोज तुझी आठवण येते आणि
रोज डोळ्यांत पाणी उभं राह्तं,
तू जवळ हवीस असं वाटताना
खूप दूर आहेस,हे सांगून जातं...
कित्येकदा तुला सांगावसं वाटतं
पण शब्द ओठातच गुदमरतात,
पापण्यांची अबोल किलबिल होते
आणि शब्द डोळ्यांतच उमटतात...
माझ्या नजरेचा अथॅ तुला समजावा
म्हणून मी शब्दांची वाट धरली,
ते शब्द वाचूनही तू अबोध राहिलीस
या वाटेवर येऊन मी चूक तर नाही केली?
का,कोणासाठी इतके वाटावे?
का,कोणासाठी इतके झुरावे?
अनोळखी,तरीही परिचित असावे,
यालाच का "प्रेम" म्हणावे?
असं नातं आहे आपल्यात
जे आपल्या दोघिनाही सांगता येत नाही,
मनात भावनांची गुंफण होऊनही
शब्द् माञ ओठांत येत नाहीत... 

बाल कवी ( विशू ).

नाणेघाटातली प्राचीन गुहा

पुण्यापासून अवघ्या शंभर किलोमीटरच्या परिघात अगणित गुहा मानवाने सह्याद्रीच्या अंगाखांद्यांवर खोदल्या आहेत. बहुतांश कलात्मक गुहांमागील मूळ उद्देश हा जगरहाटीपासून दूर असलेली ध्यानधारणेसाठीची कलात्मक जागा निर्माण करण्याचा होता. लोणावळा (कार्ले-भाजे), खंडाळा (कोंडिवडे), पाली, जुन्नर, कर्जत या भागांमध्ये अशा बर्‍याच प्रसिद्ध गुहा आहेत. त्यातच आजवर अपरिचित असलेली आणि गेल्या काही वर्षांत प्रसिद्ध झालेले एक गुहा असलेले ठिकाण म्हणजे नाणेघाट. 
घाटवाटांवरचा प्राचीन विसावा
जुन्नरपासून साधारण ३२ किमी अंतरावर घाटघर गावानजीक असणारी ही गुहा ही घाटवाटेवरच्या वाटसरुंसाठी खोदली गेली आहे. दम काढणार्‍या पुरातन घाटवाटांवर थकल्या-भागल्या जीवाला क्षणभर विसावा, थंडगार सावली आणि अमृतासमान शीतल जल यांसारखे सुख म्हणजेच स्वर्ग. नाणेघाट ही तशीच एक पुरातन घाटवाट. सातवाहन राजांच्या कारकिर्दीत कोकणापट्टीतले कल्याण-नालासोपारा आणि घाटावरचे जुन्नर-पैठण यांना जोडणारा समृद्ध व्यापारी मार्ग (ट्रेड रुट) उपलब्ध होता. सह्याद्रीचे छातीवर येणारे कडे पार करण्यासाठी नाणेघाट, दार्‍या घाट, मढेघाट असे अनेक घाटमार्ग प्रचलित होते. रेशीम, मसाले, पशुधनाची वाहतूक या मार्गांद्वारे होत असे. याच वाटेवरच्या पांथस्थांची सोय म्हणून नाणेघाटातली गुहा सातवाहनांनी खोदली. गुहेतील अनेक शिलालेख सातवाहन राजघराण्यातील काही नावे उद्धृत करतात. अधिक बारकाईने गुहेचे निरीक्षण केल्यास काही अतिप्राचीन मर्यादित व्यक्तिशिल्पकलेची असणारी उदाहरणे तत्कालीन इतिहासाचा पट आपल्यासमोर उलगडून दाखवतात. 
रेक कसा आखाल?
मुख्य गुहेच्या छतावर आणि भिंतींवर अनेक प्राचीन ब्राम्हीलिपीतले लेख आणि चित्रे कोरली गेली आहेत. आजूबाजूला आणि थोडे वरच्या साधारण डझनभर उपगुहांचा समूह आहे. तुमच्या-आमच्या सारख्या ट्रेकर्सनी ही गुहा आजवर स्वच्छ ठेवली आहे. अगदी दरीकडे मुख करुन असलेली गुहा आणि त्यात मुक्कामाचा आनंद केवळ अवर्णनीयच. रात्रीचा मुक्काम तिथे करण्याच्या बेतानेच ट्रेकची आखणी करावी. नाणेघाटात जाण्यासाठी कल्याण-नगर महामार्गाद्वारे वैशाखरे गावी पोचून तिथून पुढे साधारण अडीच-तीन तासांचा सोपा ट्रेक आहे. जुन्नरमार्गे जायचे असल्यास माळशेज घाटाला वळसा घालून पुढे जुन्नरला पोचून आपटाळे-चावंडवाडी मार्गे घाटघरला पोचावे. पुण्याहून जुन्नरला नारायणगाव मार्गे पोचावे. 
  काय पाहाल?
घाटघरहून जीवधन किल्ल्याला बगल देणारा चार किलोमीटरचा अगदी नाणेघाटाच्या मुखाशी गाडी जाण्यायोग्य रस्ता आहे. मुखाशीच डाव्या बाजूला गणेशाची प्रतिमा असलेली गुहा आणि काही उपगुहा आहेत. उजव्या हाताला जकातीचा दगडी रांजण आहे. शंभर-दीडशे मीटरची खडकाळ उतरण उतरली की आपण नाणेघाटाच्या मुख्य गुहेशी येऊन पोचतो. तिच्या समोर आणि माथ्यावर आणखी चारपाच गुहा आहेत. तिच्यासमोरुन पुढे खोदलेली पाण्याची चार-पाच टाकी दिसून येतात. त्यातील सर्वात शेवटच्या टाक्यातले पाणी पिण्यायोग्या आहे. हे सर्व पाहून पुन्हा खिंडीच्या घाटावरील मुखाशी यावे आणि डावीकडे गणेशमूर्तीच्या बाजूने जाणार्‍या वाटेने थोडी चढण चढून वर जावे. हाच तो प्रसिद्ध ‘नानाचा अंगठा’. म्हणजे नाणेघाटाच्या सर्व गुहा ज्या डोंगरात खोदल्या आहेत तो डोंगर. माथ्यावरुन आसपासच्या परिसराचे विहंगन दृश्य दिसते. मागच्या बाजूला जीवधन किल्ला आणि त्याचा चिरपरिचित, सगळ्या क्लाइंबर्सचे आव्हान असणारा वानरलिंगी ऊर्फ खडा पारशी. मग त्यापुढे क्रमाक्रमाने दार्‍या घाट, ढाकोबा, दुर्ग, अहुपे घाट अशी सह्याद्रीची सर्वांगसुंदर रांग आहे. 
अनुभवावा गुहेतला मुक्काम
राहण्याची सोय गुहेत होतेच. हवे असेल तर जेवणाची सोय तीन किलोमीटरवरील घाटघर गावात होऊ शकते. जुन्नरवरुन घाटघरला जाण्यासाठी दिवसातून दोन एसटी बस आहेत. खाजगी जीपने देखील घाटघरला पोचता येते. दोन दिवसांचा बेत करुन नाणेघाटाबरोबरच जीवधनचा ट्रेकही आखता येईल. आसपासच्या परिसरात जीवधन, चावंड, हडसर, ढाकोबा, दार्‍या घाट ट्रेकर्सची खास ठिकाणे आणि अंबोली (ता. जुन्नर) सारखे निसर्गरम्य ठिकाण आहेत. नानाच्या अंगठ्यावरुन पाहता पावसाळ्यात ढगांचा कापूस सह्यकड्यांशी मस्ती करत असतो तर इतर ऋतूमध्ये समोरचा सगळा कोकणचा परिसर आपण कवेत घेतल्याचा भास होतो. नानाच्या अंगठ्यावरुन पाहिलेला सूर्यास्त हा तर कुणीही उभ्या जन्मात विसरणे शक्य नाही. हाच सूर्यास्त पाहून पुन्हा मुख्य गुहेत मुक्कामाला यावे आणि मस्त शेकोटी पेटवून मित्रमंडळींसमवेत आयुष्याची शिदोरी सोडून सर्व ट्रेक्सच्या अनुभवाची उजळणी करावे, गप्पांचा फड जमवून तारे मोजत रात्र जागवावी, किंवा कोकणकड्यावर कोसळणार्‍या तुफानी पावसाची आणि साथीने कोसळणार्‍या जलप्रपातांची गाज कानात साठवून घ्यावी. निद्रादेवी कधी पाश टाकेल ते समजणारच नाही. दुसर्‍या दिवशी जाग येईल तेव्हा एक नवीन बेफाम अनुभव गाठीशी आला असेल. आपापला कचरा गोळा करावा आणि पुढल्या वीकेंडला कुठे याचा विचार सुरु करावा.

उपयुक्त माहिती:

जाण्याचे मार्ग:


१. पुणे-नारायणगाव-जुन्नर-आपटाळे-चावंडवाडी-घाटघर-नाणेघाट

२.
मुंबई-कल्याण-वैशाखरे-नाणेघाट (ट्रेकचा मार्ग)

३. मुंबई-कल्याण-वैशाखरे-माळशेज घाट-जुन्नर-आपटाळे-चावंडवाडी-घाटघर-नाणेघाट

४. नाशिक-संगमनेर-आळेफाटा-नारायणगाव-जुन्नर-आपटाळे-चावंडवाडी-घाटघर-नाणेघाट.

आसपासचा परिसर:

 १. शिवनेरी (जुन्नर)
२. जीवधन
३. दार्‍या घाट
४. दुर्ग-ढाकोबा जुळे किल्ले.
५. चावंड किल्ला.
६. हडसर किल्ला

टिप्स: 

  • मुक्कामाची सोय नाणेघाटाच्या मुख्य गुहेत स्वतः करावी. जेवणाची सोय घाटघर गावात होऊ शकते.
  • घाटघर गावातून विजवाहक तारांच्या दिशेने जाणार्‍या रस्त्याने पुढे जावे, तो रस्ता बरोबर नाणेघाटात जातो.
  • मोठा ट्रेक हवा असेल तर नाणेघाटात मुक्काम करुन पुढे जीवधन किल्ला करावा.
  सुहास पवार =>